मुंबईहून आणि पनवेलहूनही तीन बचाव पथकं इर्शाळवाडीत दाखल झाली आहेत. लोकांच्या मदतीसाठी पोलिसांनी नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती रायगड पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, गिरीश महाजन आणि बंदरविकास मंत्री दादा भुसे घटनेची पाहणी करण्यासाठी इर्शाळवाडीत दाखल झाले आहेत. दरम्यान, बचाव पथकांनी आतापर्यंत 22 जणांची सुखरूप सुटका केली आहे. सध्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे 100 हून अधिक अधिकारी-कर्मचारी बचाव कार्यात गुंतले असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली. यासह बचावकार्यात एनडीआरएफ, स्थानिक आणि काही स्वयंसेवी संस्थांकडून मदत मिळत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

इर्शाळवाडी हे एक छोटंसं गाव असून त्या गावात 228 लोकसंख्या असलेल्या या वाडीत 48 कुटुंब राहत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पावसामुळे इर्शाळगड खडकाचा काही भाग कोसळला असून त्यात अनेक गावकरी माती-खडकांच्या ढिगार्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना काल (बुधवार, 19 जुलै) रात्री 11.30 ते 12 च्या दरम्यान घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचण निर्माण होत आहे. एनडीआरएफची बचाव पथकं दाखल झाली आहेत. आतापर्यंत या बचाव पथकांनी 25 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. जखमींना नवी मुंबईतील रुग्णालयात नेलं आहे.